Friday, June 13, 2025

आ.विक्रमसिंह पाचपुते यांनी घेतली कोरेकर कुटुंबाची भेट

ढगफुटीसदृश पाऊस, शेतकरी पुरात वाहून गेला

श्रीगोंदा दि.१३मे २०२५

तालुक्यातील उख्खलगाव परिसरात रविवारी दुपारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने बेद ओढ्याला आलेल्या पुरात भाऊसाहेब हरिभाऊ कोरेकर (वय ४२) हे शेतकरी वाहून गेले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर शेतकऱ्याचा मृतदेह अखेर रविवारी रात्री उशिरा सापडला.

उख्खलगाव परिसरात रविवारी अवघ्या दोन तासांत सुमारे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. गावातील पाझर तलाव क्रमांक एकच्या पाझर तलावाचा मातीचा भराव तुटल्याने वाळके मळ्याशी गावाचा संपर्क तुटला होता. भाऊसाहेब कोरेकर हे ओढ्याच्या पलीकडे असलेल्या शेळ्यांचा जीव वाचविण्यासाठी गेले तेव्हा ते ओढ्यात वाहून गेले. विक्रमसिंह पाचपुते यांनी उख्खलगाव येथे भेट देऊन कोरेकर यांच्या कुंटुबाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून चार लाखांची मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत कशी करता येईल, यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

कृषी विभागाने पिकांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही पाचपुते यांनी दिल्या. यावेळी तहसीलदार प्रवीण मुद्गुल गटविकास अधिकारी राणी फराटे, कृषी अधिकारी कांती चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय हाके, आदी उपस्थित होते.

तीन तासांनी मृतदेह सापडला

भाऊसाहेब कोरेकर पुरात वाहून गेले तेव्हा रात्री ११:४५ वाजता तहसीलदार प्रवीण मुदगल यांना ग्रामस्थांनी माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी रात्री गावात महसूल व कृषी विभागाची यंत्रणा पाठवली. दरम्यान, कोरेकर यांचा मृतदेह शोधून काढण्यासाठी २५० युवकांनी ओढ्यात उतरून शोध घेतला. तीन तासांनंतर त्यांचा मृतदेह सापडला.

आणखी महत्वाच्या बातम्या