कोल्हापूर दि.09 ऑक्टोबर 2023
शरद पवारांची भक्कम बाजू व नवाब मलिक कोणत्या गटात याबाबत जयंत पाटलांचे सुचक वक्तव्य
शरद पवार यांची बाजू भक्कमच आहे, त्यात शंका घेण्याचं कारण काय ? दुसरी बाजू त्यांच्या मताप्रमाणे दावा करणारच. मात्र, पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सुप्रीम कोर्टानेच शिवसेनेच्या बाबतीत भाष्य केलं आहे.
देशातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र करून दिलं आहे ज्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतपाटील यांनी दिली. पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी- काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.
शरद पवारांच्या २५ वर्षाच्या नेतृत्वामुळे आम्हा सर्वांना सत्तेत बसण्याची संधी मिळालेली आहे. गेली १७ -१८ वर्षे सगळे जण जवळपास हे मंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी शरद पवार साहेबांची कृती त्यांना अडचणीची वाटली नाही. आज त्यांची अडचण निर्माण झाली, म्हणून सगळा दोष शरद पवारांवर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार आहे तो भारतातील जनता मान्य करेल असं वाटत नाही, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकही अजित पवार गटाच्या गळाला लागल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता, जयंत पाटील यांनी तीन वाक्यात उत्तर देत सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. त्यामुळे ते असं कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक अजित पवार गटासोबत जात आहेत असं प्रसारमाध्यमांमधून मीच ऐकलं आहे, असे पाटील यांनी सांगितले.