श्रीगोंदा येथे बंदोबस्तात अतिक्रमणावर हातोडा
श्रीगोंदा :दि १४ फेब्रुवारी २०२५
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांच्या नेतृत्वाखाली टीमने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणावर हातोडा मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम काल गुरुवारी दिवसभर चालू होती व आज शुक्रवारी दिवसभर सुरू होती.
गुरुवारी सकाळी जामखेड-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील मध्य भागापासून ५० फूट दोन्ही बाजूने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. यावेळी व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली. दुपारनंतर शनी चौक, मांडवगण रोडकडे मोर्चा वळविण्यात आला. मांडवगण रोडवरील अतिक्रमणधारकांना दुकानांपुढील शेड काढा, असे सांगितले. त्यावेळी काही दुकानदारांना अंतरावर शंका असल्यामुळे मोजमाप करुन अतिक्रमणे काढण्यात आली.
शहराला जोडणारे मुख्य रस्ते आणि जामखेड-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गापासून दोन्ही बाजूची ५० फूट अंतरापर्यंतचे अतिक्रमण काढण्याच्या सूचना होत्या. त्यानुसारच कारवाई करण्यात आली.
पक्क्या बांधकामांना अभय का?
नोटीस न देता गोरगरीब व्यवसायाच्या टपऱ्या शेड काढण्यात आले. मात्र, शेजारील पक्क्या बांधकामांवर कारवाई का केली नाही? नियम सर्वांना समान का नाही, असा सवाल सर्वसामान्य व्यावसायिकांनी केला आहे. मोठ्यांची अतिक्रमणे ही सरकारमान्य आहेत का? असा सवाल केला जात आहे.
अतिक्रमणे डोकेदुखी…
श्रीगोंदा शहरात जवळपास दोन हजार जणांची व्यवसाय व रहिवासी निवासस्थानाची अतिक्रमणे आहेत. याचा प्राथमिक सर्व्हे झाला आहे. विकासासाठी ही अतिक्रमणे अडचणीची ठरू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमणाच्या विरोधात पावले उचलली आहेत.
पक्के बांधकामधारकांना नोटिसा बजावून ही अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. बेकायदा शेड उभारले अथवा बांधकाम केले. टपऱ्या टाकल्या आहेत. त्यांना नोटीस देण्याची गरज नसते. तिथे थेट कारवाई करण्याचे अधिकार आहेत, असे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले.