Saturday, June 7, 2025

फुकटचा पैसा पडला महागात..! एकास अटक दुसरा फरार…

जादा परतावा देण्याच्या आमिषाने लूटणारा आरोपी पुण्यामध्ये जेरबंद

श्रीगोंदा : दि.७ मी २०२५

जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे 13 लाख 61 हजार 66 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी एकास पुणे इथून अटक केली आहे.

१९ डिसेंबर २०२४ रोजी संजय साहेबराव बेलेकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूकीचा श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. एक लाख रुपये गुंतवा आणि महिन्याला दहा हजार रुपये परत घ्या असे आमिष दाखवून अमोल काळे याने संजय बेलेकर यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन ऑफलाईन पैस घेतले. मात्र नंतर सदरचे पैसे न दिल्याने बेलेकर यांनी अमोल साहेबराव काळे आणि किशोर हरिश्चंद्र नवले या दोघांविरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. दि.१९ डिसेंबर पासून ५जून पर्यंत त्यातील मुख्य आरोपी पोलिसांना चकवा देत होता. मात्र दि.५ जून रोजी तो एका ठिकाणी रात्री वाढदिवसाला जाणार आहे आणि तो पुण्यात कोंडवा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो.नि.शिंदे यांनी सूचना देऊन तपासी अधिकारी गणेश अहिरे, पो. कॉ. संदीप राऊत, पो. कॉ. अरुण पवार यांना पाठवले असता रात्री उशिरा अमोल काळे मिळून आला. त्याला श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे आणून त्याची चौकशी करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी श्रीगोंदा तालुका आणि आसपासच्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक केलेली असेल अशा सर्व गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व कागदोपत्र घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून श्रीगोंदा पोलिस या गुन्ह्याचा योग्य तपास करून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदरांना मदत करू शकतात. तसेच ट्रेडिंगच्या किंवा इतर ज्या काही वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीचे आमिष दाखवणारे इन्वेस्टर्स म्हणून समोर येत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्याची खात्री केल्याशिवाय कोणीही कुठेही गुंतवणूक करू नये असे आव्हान श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पो.नि.किरण शिंदे यांनी केले आहे.

चौकट

श्रीगोंदा तालुक्यात शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांची संख्या मोठी असून अशीच एक कंपनी ज्यामध्ये तालुक्यातील बहुतांश लोकांनी गुंतवणूक केली आहे परंतु गेल्या चार महिन्यापासून या गुंतवणूकदारांना कसलाच परतावा मिळाला नाही. आत्तापर्यंत या कंपनीने तीन ते चार वेळा कंपनीचे नाव बदलले आहे. कंपनी बंद पडली अशा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून प्रत्यक्षात मात्र कोणीच पुढे यायला तयार नाही, गोरगरीब गुंतवणूकदार अडचणीत असून रक्कम भेटेन का नाही याच चिंतेत आहे. यासाठी तालुक्यातील गुंतवणूक दारांनी एकत्र यावे असे आवाहन काही मंडळी करताना दिसत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या