ताज्या बातम्यानुकसानीचे तत्काळ पंचनामे करा,आ. पाचपुतेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा,आ. पाचपुतेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

spot_img
spot_img

नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा,आ. पाचपुतेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

श्रीगोंदा : दि.१३ मे २०२५

श्रीगोंदा तालुक्यात बुधवार (दि.११) रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह सर्वांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आ. विक्रम सिंह पाचपुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बुधवारी सायंकाळी संपूर्ण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विविध भागात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या वखारी वरील पत्रे उडाल्याने काही भागात कांदा भिजला आहे. तसेच घरावरील पत्रे, पडवी, जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाल्याने दुग्ध व्यवसायिकांचेही नुकसान झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही वादळी वाऱ्याच्या पावसाचा फटका बसला आहे. विजेचे पोल व विद्युत तारा तुटल्याने संपूर्ण तालुक्यातील वीज गायब झाली आहे.

आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी तहसीलदार, महावितरण कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसान झालेला एकही शेतकरी अथवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचेही पाचपुते यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आपत्तीग्रस्त परिस्थितीत सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची तसेच नुकसान झालेले शेतकरी व नागरिकांना लवकरच मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. पाचपुते यांनी सांगितले.

पाचपुतेंच्या भूमिकेमुळे नुकसानग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांकडून आ. पाचपुते यांचे आभार मानले आहे.

नुकसानग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही !

वादळी वाऱ्यासह शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्रशासकीय पातळीवर तात्काळ पंचनामे करण्यात येणार आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाच्या वतीने लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात येईल. आपत्तीग्रस्त परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.

आ. विक्रमसिंह पाचपुते

लेटेस्ट न्यूज़