राजकीय नेते लग्नाला गेले म्हणून टीका योग्य नाही : डॉ.सुजय विखे-पाटील
हगवणे प्रकरणात पवारांची पाठराखण
अहिल्यानगर : सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. या प्रकरणात माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण करीत दोषी लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली पाहिजे, परंतु एखाद्या लग्नात. भेट दिली म्हणून राजकीय व्यक्तींवर टीका करणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले आहे.
खडके-वाके (ता. राहाता) येथे निळवंडेच्या पाण्याने भरलेल्या तलावाचे जलपूजन कार्यक्रम रविवारी झाला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले, अजित पवार हे होतकरू नेतृत्व आहे. एखाद्या लग्नात उपस्थित राहणे आणि फोटो काढणे चुकीचे नाही. आम्ही देखील अनेक लग्नात भेटी देत असतो. परंतु, लग्नाला भेटी दिलेले अनेक मुले-मुली दुर्दैवाने वेगळे होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मी एका लग्नाला गेलो. स्टेजवर बसलो. नवरदेव आला, पण मुलगी लग्नातून पळून गेली. मग काय करणार ? त्यामुळे अशा गोष्टीत राजकीय व्यक्तींना ओढू नये. वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींना शिक्षा मिळाली पाहिजे.
ते पुढे म्हणाले, आमच्यासमोर आलेला कोणतीही व्यक्ती फोटो काढू शकते. फोटो काढल्यावर लोक सांगतात हा वाळू तस्कर आहे, ३०२ चा आरोपी आहे. आता यासाठी कायदा करावा लागेल. गुन्हा दाखल असलेल्या आरोपीच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे. म्हणजे राजकीय लोकांच्या लक्षात येईल.
टीकाकारांना पत्रिका पाठवाव्या लागतील
अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना लग्नपत्रिका येत नाहीत. त्यामुळे दुसरा माणूस लग्नाला गेल्यावर त्यांना त्रास होऊ शकतो.त्यामुळे शरद पवार गट आणि ठाकरे गटालादेखील लोकांनी लग्नपत्रिका पाठविल्या पाहिजेत. म्हणजे त्यांचे आक्षेप राहणार नाहीत, अशी टीका विखे पाटील यांनी केली.