श्रीगोंद्यात राजकारणाचं वार फिरलय…?
श्रीगोंदा दि.7जून 2025
भाजप सह महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या इनकमिंग जोरात सुरू आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तसतसे पक्ष प्रवेशाचे सोहळे वाढतील तिन्ही पक्षांना वाटते की आपण ज्यांना आणत आहोत त्यामुळे पक्षाचे भांडवल वाढेल पण प्रत्येक जिल्ह्यासह तालुक्याच्या राजकारणाचा विचार केला तर महायुतीत भांडणं लागण्यासाठी हे इनकमिंगवाले जबाबदार असतील. हा धोक्याचा इशारा आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव तीन-चार महिन्यांमध्येच येईल. यासंदर्भात श्रीगोंदात राष्ट्रवादी अजित पवार गटात का सुरू आहे इनकमिंग.. याच विषयाच हे विश्लेषण…
श्रीगोंद्याचे आमदार पाचपुते यांचे कट्टर विरोधक नागवडे व जगताप हे मागील आठवड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले . महायुतीमध्ये नागवडे अन जगताप एकत्र राहतील का ? हे श्रीगोंद्याचं शेंबड पोरही सांगेल. पूर्वी विरोधात होते तेव्हा रेषा स्पष्ट होत्या आता दोघे मित्र पक्षात आहेत संघर्ष तर होईलच अशी चर्चा आहे.
विधानसभेला एकमेकांसमोर उभे ठाकणारे स्टेजवरून एकमेकाची उणीदूनी काढणारे एकत्र अजित पवार गटात गेले. सध्या विद्यमान आमदार भाजपचे विक्रम पाचपुते आहेत. त्यामुळे तालुक्यात सध्या पक्षप्रवेशामुळे विरोधक शिल्लक राहिला नसल्याची जोरदार चर्चा होत आहे. आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की नेत्यांनी पक्ष प्रवेश केल्यावर विरोधक संपले असे नाही तर कार्यकर्ते अजूनही विरोधात आहेत असे सूचक विधान त्यांनी केले. महायुतीने जणू पक्षप्रवेशाचा चंग बांधला असला तरी त्या नादात आपण आपल्यातच एकमेकांचे विरोधक तयार करत आहोत याचे भान दिसत नाही. उद्या हेच नेते एकमेकांना पाडतील महायुतीतील तीन पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याची ही लक्षणे आहेत.
माजी आमदार राहुल जगताप शरद पवार गटात होते विधानसभेच्या वेळी तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी केली. तेथेही त्यांचा दारुण पराभव झाला व त्यानंतर मागील आठवड्यात त्यांनी कारखाना वाचवण्यासाठी अजितदादा गटात प्रवेश केल्याच्या जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस मधून राष्ट्रवादी अजित पवार गट नंतर विधानसभेच्या वेळी तिकिटासाठी उद्धव ठाकरे शिवसेना असा प्रवेश करणारे नागवडे यांनी सुद्धा सत्तेच्या हव्यासापोटी अजित पवार गटात पुन्हा घर वापसी केली आहे. विशेष म्हणजे एकमेकाचे कट्टर विरोधक असणारे जगताप नागवडे यांनी एकाच दिवशी दादा गटात प्रवेश केला. पण हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या मोठ्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला अजित दादा का उपस्थितीत राहिले नाहीत. अशाही चर्चा चौका चौकात व कार्यकर्त्यात सुरू आहेत.
आता एका मेन्यात दोन तलवारी बसायच्या कशा? महायुतीत जागोजागी ताकद वाढत असल्याचे चित्र सध्या आहे उद्या हेच ओझे वाटू शकते का? हा ही संशोधनाचा विषय आहे.
जास्त नेतेमंडळी असलेला तालुका म्हणून श्रीगोंद्याची ओळख आणि आता याच तालुक्यात सगळ्यात जास्त नेते अजित दादा गटात गेले आहे. विधानसभेवेळी जनतेला गृहीत धरून निवडणूक पार पडणारे नेते आता एकत्रित दिसू लागल्याने गाव पातळीवर जनता व कार्यकर्ते नाराज आहेत. यांच्या साठी निवडणुकीत काम करणारे कार्यकर्ते सरपंच ते सदस्य आजही एकमेकांना विरोधक समजत तोंडही पाहत नाहीत परंतु ज्या नेत्यासाठी काम केले त्या नेत्यांना याचं काहीच देणं घेणं नाही त्यामुळे आगामी निवडणुकात या नेत्यांना कसा धडा शिकवायचा याच चर्चा गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात ऐकण्यास मिळत आहेत .
राजकारण नेहमी सोयीने केले जाते राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू किंवा मित्र नाही असे म्हटले जाते. परंतु श्रीगोंद्याचं राजकारण जरा बेरकीच इथं फक्त फायद्याचं राजकारण पाहिलं जातं. पाचपुते यांनी आजपर्यंत फक्त दोनच पक्ष बदलले आणि त्या पक्षाशी ते एकनिष्ठ राहिले म्हणून गेली अनेक वर्ष ते सत्तेत आहेत. पाचपुतेंना जनतेने नाकारल्यानंतर न डगमगता त्यांनी विरोधकाची भूमिका निभावली पण इतर नेत्यांनी फक्त सत्तेची कास धरत मतदारसंघाचा विकास न पाहता स्वतःच्या स्व:हितासाठी पक्षप्रवेशाचा चंग बांधलेला पाहावयास मिळतो. अशा नेत्यांना जनता आगामी निवडणुकांमध्ये स्वीकारेल का असा प्रश्न सर्व सामान्य जनतेमध्ये उपस्थित होऊ लागला.