महिला बचत गटांचा विश्वास हरला,अन् घोटाळेबाजांचा बाजार भरला..!
श्रीगोंदा दि.22 मार्च 2025
श्रीगोंदा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महिला स्वयंसहायता बचत गटांच्या नावाखाली लाखोंचा अपहार झाल्याची गोष्ट उघड झाली, अन् घोटाळेबाजांची एकच धावपळ सुरू झाली.
घोटाळेबाजांनी घातलेल्या घोटाळ्याचे सत्र थांबताना दिसत नसल्याने, रोज नवीन घोटाळे समोर येत आहेत, त्यामुळे तालुक्यातील अनेक बचत गटांची द्विधा मनस्थितीत झाली आहे. सरकार कडून गोरगरीब महिलांना मिळणारा लाभ काही घोटाळेबाजांनी वैयक्तिक फायद्यासाठी घेतला. यामुळे सरकार लाभ देतंय पण मध्येच कोण खातंय अशी परिस्थिती श्रीगोंद्यात पाहायला मिळाली आहे. यामधून बचत गटांचा फायदा तर नाही पण तोटा मात्र नक्कीच झाला आहे.
श्रीगोंद्यात बचत गटात झालेल्या घोटाळ्याची आता चौकशी सुरू झाली असून त्यात प्रशासनाने आता नोटिसा काढल्याने चांगलाच गोधळ उडाला आहे.
तालुक्यातील घोटाळेबाजांनी बचत गटांच्या माध्यमातून घातलेला घोटाळा जवळपास कोटींच्या घरात जाण्याची शक्यता चौकशीत सिद्ध झाल्याचे समजत आहे.
गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळेच अनेक बचत गटांचा घोटाळा समोर आला. त्यामध्ये ग्रामसंघ, प्रभागसंघ यांनी संगनमताने बचत गटांच्या अध्यक्ष सचिव यांच्याकडून निनावी धनादेश घेऊन खाजगी संस्थेच्या नावाखाली वठवले. त्यावेळी बचत गटांच्या महिलांना सरकारी योजनेतून आपल्याला विविध प्रकारचे साहित्य सरकारकडून मिळणार असे सांगितले होते. त्याच नावाखाली अध्यक्ष व सचिव यांच्या सहीचे कोरे धनादेश घेण्यात आले. मात्र त्या घोटाळेबाजांनी या सर्व धनादेशांचा गैरव्यवहार केला असल्याचे चौकशीत समोर आले असुन, त्यांचा चौकशी अहवाल गेल्या आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जमा केला असल्याचे समजले.
अहवालानुसार नोटिसा काढून खुलासा मागविला :राहुल शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी
श्रीगोंद्यातील बचत गटांच्या घोटाळ्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून जिल्हा परिषदेला चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. तालुक्यातील अनेक प्रभागसंघ,ग्रामसंघ यांच्यासह अनेक बचत गटांच्या अध्यक्ष सचिव यांनाही नोटिसा काढून खुलासा मागविण्यात आला असून सात दिवसाच्या मुदतीत हा खुलासा द्यायचा आहे. त्यांचा खुलासा आल्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी नगरीपंचशी बोलताना दिली आहे.
चौकट
नगरीपंच नेहमीच वास्तव व अन्याय्य विरुद्ध बातम्या प्रसिद्ध करत असते. अन् त्यात बचत गट हा महिलांच्या जवळचा व आपुलकीचा विषय यामध्ये झालेल्या घोटाळ्या संदर्भात नगरीपंचने बातमी प्रकाशित केल्यानंतर या घोटाळ्यात सामील असलेल्या घोटाळेबाजांनी एका मध्यस्थी महिले मार्फत नगरीपंचच्या संपादिका सौ. ढवळे यांना फोन करून बातमी का प्रकाशित केली. ज्या पत्रकारांनी बातम्या लावल्या त्यांना थांबवले आहे. व काही पत्रकारांवर ऑनलाईन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा बातम्या विचार करून प्रसिद्ध कराव्यात असा धमकी वजा इशारा दिला. परंतु निर्भीड अशा सौ. ढवळे यांनीही घोटाळेबाजांच्या चेले चपाट्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. आता तर गोरगरीब महिलांना न्याय मिळून देण्यासाठी तालुक्यातील सामाजिक संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. या गोष्टींचा मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणार असून, व या घोटाळ्याविरुद्ध लवकरच मोठे आंदोलन छेडले जाणार आहे. तसेच संबंधित घोटाळेबाजांवर व त्यांच्या चेल्या चपाट्यांवर महिला पत्रकाराला दमबाजी केल्याचा गुन्हा एसपी ऑफिस अहिल्यानगर येथे दाखल करणार असल्याचे सांगितले.